Wednesday, December 7, 2011

जो शादी वाले घर मे सेवा करता है, उसको बोहोत सुंदर बिवी मिलती है

~~~~
My OLD Article after getting engaged on 07 DEC 2011 :)- This was earlier published on MomentVille (WEDSITE)
~~~~~

"माझे लग्न ठरताना...." असा एक लेखच' लिहिणार होतो, पण म्हटलं उगीच एवढे मी'पण बरे नव्हे.
तर माझे लग्न कसे कधी कुठे आणि केव्हा ठरले ह्याबद्दल उत्सुकता असणाऱ्या सर्वांना त्यांच्या curiosity बद्दल धन्यवाद !

बहुतेक सगळ्या Arranged Marriages चा महत्त्वाचा दुवा म्हणजे "विवाह मंडळ" -  Mr.&Mrs. कानिटकरांचे 'अनुरूप' आमच्या मदतीला तत्पर राहिले.

लग्नासाठीची मानसिक,आर्थिक,नैतिक व  नावनोंदणीची तयारी -- त्यानंतर प्रत्यक्ष विवाहमंडळात नाव नोंदणी -- पसंती-नापसंती --- आणि मग लग्न  !  खूप भारी असतो बरं का हा सगळा प्रवास --- वाचताना वाटतो तेवढा साधा सरळ सोपा अजिबात नसतो !

अनेक लग्नाळलेल्या,In process, expecting bride, लोकांनी "लग्न आणि त्याबाबतच्या (भ्रामक)समजुती" ह्यावर कितीतरी मजेदार, किस्सेदार, खुमासदार (ज्यांनी स्वानुभव दिलेत त्यांच्या बाबतीत दिलदार देखिल) लेखन केले आहेच... आणि हाच साहित्यसाठा वाचत वाचत आम्ही लहानाचे मोठे झाले.... (येथे अर्थ वय २२ ते २७ )

कितीही पुढारलेले घराणे किंवा जमाना आला तरी योग्य वयात घरचे मोठे बहीण भाऊ, किंवा नातेवाईकांतील समंजस व्यक्ती आपल्याला एक कानमंत्र देतात'च    तो म्हणजे " मैत्रिणी कोणत्याही चालतील, पण बायको शक्यतो "आपल्यातलीच" बघा !"  आणि तो चुकीचा आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही, पण प्रत्येकाला स्वतःचे मत असते आणि त्याबाबत त्यानेच निर्णय घेणे योग्य.

असो, तर हा कानमंत्र तर पाचवीलाच पुजल्याने आम्ही प्रेमं बिमं करायच्या भानगडीत पडलोच नाही.... ! काही खट्याळ आणि खोड्याळ लोकं या वाक्यानंतर "जमलंच नसेल... " वगैरे बाष्कळ विनोद करू पाहतील पण त्यांना महत्त्व दिल्याने त्यांचा उपद्रव आणि आपल्याला त्यांची येणारी कीव दोन्ही वाढतं जात -  म्हणून IGNORE & Proceed पद्धत मी आचरणात आणतो.

लग्नाच्या योग्य वयात (अजून तरी २६ ते २९) आल्यावर आम्ही आणि घरचे मिळून एका गहन चर्चेला बसलो - लग्न करायचे का ? कुठे काही प्रकरणं नाहीये ना आधीच ? नाव नोंदवूयात का ? वगैरे प्रश्नांवर गहन  बोलणी होवून उद्या ठरवू ह्या स्वल्पविरामानंतर मग कॉफी किंवा डाळ तांदुळाच्या खिचडीने चर्चेची सांगता केली जाते.

एकदा नाव नोंदवले की मग फोन Enquiry सुरू होतात   --आणि मग मुलगा असो वा मुलगी.... दोघांनाही गरम मसाला पिक्चरमध्ये अक्षय कुमारच्या ओळींचा प्रत्यय येतो..."जो हमे चाहिये उसे हम नाही चाहिये, और जिसे हम चाहिये वो किसको चाहिये ??"

ह्यानंतर मग सुरू होतो तो कांदेपोहे (आत्त्ताच्या generationचा चहा-कॉफीचा) प्रोग्रॅम...  त्यातून समोरचा माणूस उलगडला तर ठीक नाहीतर मग - बोरींग,वाढीव,आगाऊ,मिजासखोर आणि अशी अनेक विशेषणं लावून Rejection चा ठप्पा लावून गुडबाय ! एवढं सगळं झाल्यानंतर मग मात्र एका ठिकाणी WaveLength जुळते ! मग घरच्यांचा बोलीचाली आणि मग शेवटी धूमधडाका - !

आमचं देखिल ALMOST सगळं असंच झालं -> अनुरूप मध्ये प्रोफाइल्स पाहिल्या, मग पहिली भेट, दुसरी भेट, Familly involvements, इंटरनेट वरून Chat connectivity आणि Final GO/NO-GO !!

शेवटी शाहरुख चे DDLJ मधले वाक्य खरे ठरले !! -"जो शादी वाले घर मे सेवा करता है, उसको बोहोत सुंदर बिवी मिलती है"-  आजवर अनेक लग्नांमध्ये पु.लं.चा  'नारायण' Character निभावल्याचे उत्तम फळ मिळाले आहे -
माझ्या UnMarried दोस्तांनो, हा Funda Try करा - तुम्हाला देखील नक्कीच प्रत्यय येईल..... 

ही आमची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण !!

Monday, December 5, 2011

आनंद वाटणारा देव !

देव-आनंद यांना एका चाहत्याचा मानाचा मुजरा,

नावातच आनंद असणारा माझा सर्वात आवडता कलाकार, काळाच्या पडद्याआड गेल्याचे समजले आणि मी मिनिटभरताच गाईड, जॉनी मेरा नाम, हम दोनो, बाझी, नौ-दो-ग्यारह,काला बाजार, तेरे घर के सामने -- अश्या कितीतरी सिनेमांची नावे डोळ्यासमोर तरळून गेली...

सध्या म्हणजे, १९९० नंतर=> नव्या जमान्यातली सिनेमा/गाणी/संगीताची खास चव उरलेली नाही, नुसता धांगडधिय्या आणि अंगप्रदर्शन ह्यामध्येच सगळे सिनेमा उरकतात. - अशी हमखास टिका होते ! आणि बहुतांशी ते खरे देखील आहे असे मला वाटते. अगदी बोटावर मोजण्याएवढे दर्जेदार अपवाद सोडले तर बाकी सगळेच 'गल्लाभरू' ह्या कॅटॅगरी मध्ये येतात. असो आजचा विषय तो नाही, आणि त्यावर जास्त बोलण्यात अर्थ देखिल नाही !

देव आनंद आणि माझी कधी समोरासमोर भेट झाली नाही, परंतु खूपं इच्छा होती भेटीची ( अगदी लक्ष्मीकांत बेर्डेसारखीच). मी लहानपणी चित्र-आकलन होऊ लागले तेव्हापासून देव आनंद ची गाणी पाहत ऐकत आलो आहे, घरी आई-बाबा जुन्या गाण्यांच्या व्हिडिओ कॅसेट लावायचे तेव्हा १० पैकी ५ गाणी देव साहेबांचीच होती तेव्हापासून कळत नकळत थोडी देव-आनंद स्टाइल कॉपी होऊ लागली.

शाळेत मॉनिटर रोज एक सुविचार लिहायचा, आणि आम्हाला तो वर्गवाणीच्या वहीत लिहावा लागायचा...ज्या दिवशी काही नवीन मिळणार नाही तेव्हा २ सुविचार ठरलेले असायचे,

१) दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही.!

२) केस वाढवून देव-आनंद (आणि इथे हमखास देवानंद असे लिहिले जायचे) होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा !

दुसरा सुविचार कायम डोक्यात जायचा, आणि मी ह्या वाक्याला कधीही मान्य करण्यास तयार नसायचो !- हा सुविचार म्हणून असायच्या त्या दिवशी मी जागा रिकामी ठेवून घरी जाऊन काहीतरी शोधून लिहायचो पण हे लिहिणे मला मान्यच नव्हते !! फक्त केस वाढले म्हणजे देव-आनंद होता येते काय? की फक्त ज्ञानाने तुम्हाला कोणी विवेकानंद म्हणणार? उगीच आपले ट-ला-ट जोडून काहीतरी यमक जुळवायचे आणि सुविचार म्हणायचं!

उत्तम संवादफ़ेक, नृत्य (उत्तम नसले तरी बीभत्स नक्कीच नाही), आणि जबरदस्त संवाद-कथानक मिळालेले सिनेमे. जेवढे बघितले तेवढेच पुन्हा पाहण्याजोगे !! आणि अगदी सगळा सिनेमा नाही, तरी देव-आनंद ची गाणी तर नक्कीच अजरामर आहेत ! ह्या माणसाच्या आयुष्याला कितीतरी पैलू आहेत ते विकिपीडिया/गूगल वर एका क्लिक मधून समजेलच.

मध्यंतरी "हम दोनो" हा सिनेमा इस्टमनकलर मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा मी मंगला टॉकीज ला तिकिट काढून गेलो होतो, मधलेच तिकिट मिळाले होते - माझ्या एका बाजूला एक आजी आजोबा बसले होते, आणि दुसरीकडे ३ साठीच्या आसपासची माणसे, - मी गॉगल, जॅकेट काढले, जागेवर बसलो, हँडग्लोव्हस काढले आणि मोबाईल सायलेंट केला, माझे आत्याधुनिक वागणे पाहुन त्यांचे तिकिट पुढे करत आजोबा मला म्हणाले - हम दोनो' इथेच लागणार आहे ना ? का आम्ही मल्टिप्लेक्स चा स्क्रीन चुकलोय ते सांगता का प्लीज ? !

मी आजोबांना म्हणालो, आजोबा हाच आहे हॉल आणि मी सुद्धा हम दोनो पाहायलाच आलोय, त्यांना एवढा आनंद झाला ह्या वाक्याचा - आजी म्हणाल्या देव आनंद लहान-थोर सर्वामध्ये प्रसिद्ध आहे म्हणजे ! सिनेमा संपेपर्यंत आजी-आजोबा माझ्याशी गप्पा मारत होते, इंटरवल मध्ये वडापाव खाताना त्यांच्या जुन्या आठवणी सांगत होते आणि मधून मधून ब्लॅक&व्हाईट च्या वेळी आणि ही नवीन निर्मिती अशी कंम्पॅरिझन पण करून सांगत होते !

सिनेमाच्या सुरवातीलाच अत्यंत नम्रपणे देव आनंद प्रस्तावना करून सिनेमाची सुरुवात होते. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की हम दोनो च्या रंगीतीकरणानंतर बाकी सुद्धा प्रस्तावित सिनेमा रंगीत करण्याचा मानस होता, पण आता बहुदा आपण सगळेच त्या आनंदाला मुकणार आहोत, कदाचित सिनेमा रंगीत मिळेलसुद्धा पण त्याच्या सुरुवातीला प्रस्तावनेसाठी आता "आनंद" मिळणार नाही !

पुण्यात डेक्कन ला लकी नावाचे एक रेस्टॉरंट होते त्यामध्ये देव-आनंद ह्यांचा एक खूप मस्त फोटो होता, आम्ही जेव्हा जेव्हा तिथे चहा प्यायला जायचो तेव्हा तेव्हा कायम देव आनंदची गाणी आपसूक'च तोंडातून बाहेर पडायची. आणि संपूर्ण माहोल फ्रेश होऊन जायचा.

"मैं जिंदगी का साथ निभाता चला गया" म्हणत सगळी दुःखे विसरवणारा, "अपने पे भरोसा है तो एक दांव लगा ले" ह्या ओळींवर खोल विचार करणारा, "याद किया दिल ने कहॉं हो तुम", "चुडी नही ये मेरा दिल है","फुलों के रंग से", "रुक जाना ओ जाना", "अभी ना जाओ छोडकर" म्हणत नायिकेसाठी नाचत गात आपले प्रेम व्यक्त करणारा, "ये दिल ना होता बेचारा", "है अपना दिल तो आवारा", "जो भी प्यार से मिला" च्या तालावर गेला दिवस आपला म्हणणारा. एक जिंदादिल, चिरतरुण आणि रसिकप्रिय देव-आनंद आपला निरोप घेऊन "यहाँ कौन है तेरा" नियम सिद्ध करत पुढच्या सफरीवर गेला आहे.

एक देव - दुसऱ्या देवाच्या आत्म्याला शांती देवो !

--
आशुतोष दीक्षित.