Wednesday, August 21, 2013

आमची Chennai Expressची सवारी !!

 ३०० करोडची जागतिक कमाई, बहुतांश सगळे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स ब्रेक..... ह्या बातम्या येत होत्याच, परंतु शाहरुख एवढ्या दिवसानी पुन्हा ऍक्शन मध्ये आणि रोहित शेट्टीचे दिग्दर्शन यामुळे चेन्नई एक्स्प्रेस पहायचा होताच, अनेकांनी सुचना केल्या रिव्युज सांगितले, अर्थात ते सगळे मिक्स होते, काही लोक म्हणत होते अगदी बकवास काही एकदा पाहण्याजोगा आणि काही मस्त !

काही म्हणा, पण २० तारखेला राखीपौर्णिमेनिमित्य २ तिकिटांवर १ तिकिट फ्री देण्याचा प्रमोशन फंडा आपल्याला फार आवडला... चला आजवर कोणत्यातरी सिनेमावाल्याने असे केले होते का सांगा बरं ? पब्लिक ला तर बरच आहे ना... ३ऱ्या  आठवड्यातला एखादा दिवस टाका ना असा पब्लिक च्या नावने करुन, सिनेमा पण चालेल आणि लोकं पण खुश !

तर मी ई-स्क्वेअर मध्ये हा सिनेमा पहायला गेलो, आज मातोश्रींसोबत जवळ जवळ १५-१६ वर्षांनी सिनेमा पाहण्याचा योग आला..इतर वेळी आई-बाबा वेगळे आणि आम्ही आमचे मित्रमंडळी असेच सिनेमे पाहत आलोय :)  !! तर सिनेमागृहात गेलो परंतु ई-स्व्केअर ने भलतीच निराशा केली हो, २ वेळा लाईट गेले, आणि सिनेमा रिळ ट्रिप झाले, आमचे २५ मिनिटे वाया....त्या मॅनेजर आणि त्याच्या सिनिअर मॅनेजरने माझी आणि बाकी लोक जमल्यावर आमची बरिच बोलणी खाल्ली !

सिनेमाची सुरुवातच हातात फावडे घेतलेल्या राहुल च्या एंट्रीने होते, आणि मग थेट सिनेमाच्या शेवटी तो सीन येतो.. मध्ये सगळा फ्लॅशबॅक आहे :) :)  दादाजींच्या मृत्युनंतर गोव्याला गंमत करायला जाणारा राहुलला आजी अस्थी विसर्जनासाठीची गळ घालते, आजीला फसवण्यासाठी ट्रेन मध्ये बसून पुढिल स्टेशनवर उतरून गोवा गाठायचा प्लॅन, पण उतरताना दिपिकाला दिलेला हात, ट्रेन उतरण्यापुर्वीच सुटणे त्यातून चेन्नईजवळच्या गावत पोचणे, तिथे दिपिकाच्या होणाऱ्या नवऱ्याशी फाईट ठरणे, मग तिथून पळून जाणे आणि इतर गमती जमती, मध्यंतरीच्या लपालपित दिपिकावर प्रेम उत्पन्न होणे आणि मग शेवटी दिपिकाच्या घरी जाउन तिच्या वडिलांसमोर त्या लग्न ठरवलेल्या माणसाशी मारामारी करून दिपिकाचे स्वयंवर  जिंकणे- हा सिनेमाचा गाभा.

मला तर DDLJ Returns पाहिल्यासारखा वाटला, अमरिशपुरीची जागा साउथ च्या डॉन ने घेतली होती, कुलजीत च्या ऐवजी ३ कुलजीत मिळून एक होतील असा रांगडा मनुष्य आहे आणि इथे शाहरुख चा गुरुर ललकारायला अनुपन खेर नसून त्याचे दिपिकावरील प्रेम आहे एवढाच काय तो बेसिक फरक...चित्रपट एकदा फुकट किंवा सिडीवर बघण्याच्या लायकिचा आहे, पण उणीवा खुप आहेत...आधी चांगल्या गोष्टी सांगतो मग उणीवा...

जमेची बाजू:
१) रोहीत शेट्टी स्टाईल गाड्यांच्या आणि आगीच्या करामती ठिक आहेत... उदा. गॅसस्टोव फेकल्यावर तो शाहरुखने चुकवणे पण मागिल टेबलावर तो पडून बॅकग्राउंडला प्रचंड आगिचे लोळ दाखवणे वगैरे. .. पण गाडिच्या चाकावर कोयता मारून गाडी पलटवणारा सीन म्हणजे XMen-Origins Wolverine ची कॉपी करण्याचा निष्फळ प्रयत्न वाटतो.
२) गाणी चांगली आहेत, निदान गुणगुणता येण्यासारखी तरी आहेत.
३) शाहरुखला काही काही वाक्यांत विनोदनिर्मीतीची चांगली संधी मिळाली आहे.
४) सिन सिनरी मस्त पिक्चराईझ केली आहे. कॅमेरा अँगल्स चा वापर प्रभावीपणे केलेला आहे.

आता उणीवा आणि चुका -->
१) साउथवरून पळून आलेली दिपिका गुंड मागे लागलेत म्हणून 'चेन्नई एक्स्प्रेस्' मागे कशी पळेल बरं >>?
२) त्या कोणत्याश्या गावात फक्त दिपिका, तिचा होणारा नवरा आणि एक शीख पोलिस इंस्पेक्टर ह्यांनाच हिंदी कळत असते... ??  हे पचवणे केवळ अशक्य आहे  !!
३) दिपिकाचा होणारा नवरा एवढा आडदांड घेतला आहे की शाहरुखने जादुटोणा केला तरी तो त्याला मारू शकणार नाही हे पाहताक्षाणी एखादे पोरं देखील ओळखेल... त्यामुळे ही कास्टिंग टोटल फेल !!


 ह्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन चालू होते, रेडिओ मिरची वर तर डायरेक्ट शाहरुख खानच्या घरी नेण्याची स्पर्धा आयोजित केली होती, त्यासाठी चेन्नई स्टाइल मध्ये सजून जाणे आवश्यक होते, आम्ही प्रयत्न केला पण बहुदा कमी पडला....असो पण ते २-३ तास रेडिओ मिर्ची च्या ऑफिसमध्ये धमाल केली, स्टुडिओ पाहिला -वाढिव एक्स्पेक्टेशन्स मध्ये ओव्हरऑल दिवस चांगला गेला...
 आज नाही तर पुन्हा कधितरी... उम्मीद पे तो दुनिया कायम है  !!


--
आशुतोष दीक्षित.

Tuesday, July 23, 2013

वेताळ पंचविशी..(तिसरे वर्ष सरले)


वेताळ पंचविशी...   हा शब्द मी २५ ते ५० ह्या वयोगटासाठी वापरणार आहे हे तेव्हाच ठरवले जेव्हा वयाची २५ ओलांडून त्याला गद्धेपंचविशी असे नाव दिले  होते... वेताळ हा केवळ पिशाच्याधिपती नसून तो शिवगण देखिल मानला जातो... त्यामुळे त्याच्या असीम ताकदीच्या प्रेरणेने पुढील आयुष्यात बेदम काम करायचे, PARTY HARD...WORK HARDER ह्या हिशेबाने पहिली २५ झक मारतील अशी आगेकूच करायची आणि वाटेत जे चांगले दिसेल ते घ्यायचे ह्या ओढीने  आणि वेताळाच्या प्रतीक्षेत मी तिसरे वर्ष सर केले आहे....

गेली २८ वर्षे (आधीची अजाणती वर्षे सोडली तरी निदान गेली २३ वर्षे) माझा वाढदिवस म्हणजे घरात भरपूर दंगा हे समीकरणच झाले आहे.
खूप लहान होतो तेव्हा सगळे आठवत असे नाही, पण फोटो पाहून लक्षात येते की आई-बाबांनी सगळ्यांना बोलवलेले असायचे माझ्या  वाढदिवसाला. थोडा मोठा झाल्यावर मीच आवर्जून सांगायला लागलो. तेव्हाचे कारण काही वेगळे होते, तेव्हा सदिच्छांपेक्षा गिफ्ट्स/भेटवस्तूच्या पिशव्यांवरून वाढदिवसाची गोडी मोजली जायची .... आणि खरी मजा तर ती मिळालेली गिफ्ट्स त्याच दिवशी रात्री उघडून बघण्यात असायची हे वेगळे सांगायला नकोच,  त्याच काळात शाळेत चॉकलेट्स ची पिशवी  घेऊन   वह्यांवर लावायचे स्टिकर्स किंवा पट्टी,मागे खोडरबर असलेली पेन्सिल आणि शार्पनर चा सेट, किंवा फार कशाला दोन्ही बाजूने उघडता येणारी  प्लॅस्टिकची कंपासपेटी असे काही ना काही पोरांना वाटायचे .
त्यामध्ये मोठी गंमत होती, आपल्या खास दोस्ताला आपल्या मागे चॉकलेट्स ची पिशवी धरून फिरवायचे आणि सगळ्यांना वाटून झाली की शेवट उरलेली आपण स्वतः आणि ते एक दोन खास दोस्त मिळून डबल-ट्रिपल संपवायची पण मग महाविद्यालयात आलो आणि त्या चॉकलेटच्या पिशवीचाही चार्म गेला, आणि वाढदिवसाच्या ट्रीट ची जागा घेतली ती 'अण्णा ' च्या वडापाव, फ्रायम्स पॅकेट आणि चहा ने   - खास दोस्त इथेही होते... फरक फक्त एवढाच होता की येथे फक्त आणि फक्त खास दोस्त'च होते. छोट्या शाळेतल्या सारखी सगळ्या वर्गाची  गर्दी  उरली नाही.

कॉलेजमध्ये मग ह्याच संस्कृतीने तग धरला... बदलली ती  फक्त 'ट्रीट' ची पद्धत, त्या वेळेपर्यंत मॅकडी(म्हणजे मॅकडोनाल्ड्स) आणि पिझ्झा हट, चैतन्य पराठा आदी मंडळी आमच्या त्यांच्या ऍड्व्हर्टाईझिंग स्टंटबाजीमुळे आमच्या आवाक्यात आली होती. त्यामुळे आमचा कंपू ह्या नवा विदेशी/इंग्रजी साज चढवलेल्या कट्ट्यांकडे वळू लागला...ह्या आणि ह्यासोबतच  'वीर दा ढाबा','पंजाबी ढाबा' आणि अजून अनेक नवीन कट्ट्यांनी  आमच्या खवैयेगीरीच्या ज्ञानात भर घातली.

कॉलेज संपून नोकऱ्या लागल्यावर देखील वरील ठिकाणांतील ५०% कट्ट्यांशी इमान राखून आहोत , बाकीचे काही काळाच्या पडद्याआड गेले तर काहींना आम्ही आमच्या चाकोरीबाहेर ढकलले.. पण आता मात्र दिवसाचे सगळे तास हातातल्या  मोबाईल, I-पॅड, इ. ला बांधले गेले असल्याने जमायला हवे तसे भेटायला जमत नाही, ऑफिसवाल्यांना पार्टी म्हटले की दारू व्यतिरिक्त आणखी काही दिसत नाही, त्यामुळे पार्टी रंगत जाण्याऐवजी झिंगत जाते... मग कसलं शेअरिंग आणि कसलं काय !
नाईलाज म्हणून मग आपण स्वतः पिणारे नसलो तरी असल्या पार्ट्यांना हजेरी लावून 'अटेंडस' मार्क  करून यावे लागते. (प्यायलाच पाहिजे असे काही नाही, पण अटेंडंस पाहिजे नाहीतर तुम्ही सोशल नाहीत म्हणे ! )

परंतु कॉलेजपासून ते आजपर्यंत माझ्या घरी  आवर्जून येणाऱ्या माझ्या ४-५ मित्रांना आणि आणि त्यांच्या 'कुटुंबांना' अनेक धन्यवाद..

 मित्रांनो तुम्ही येता ते तास दीड तास अगदी आनंदात जातात   असेच येत चला.... !

आज वयाची २८शी ओलांडल्यावर सरलेले सगळे वाढदिवस आठवले... प्रत्येक वाढदिवसाला काही ना काही स्पेशल होते, शाळेत असताना बाबांकडून मिळालेला व्हिडियोगेम असो किंवा कॉलेजमध्ये मित्र-मैत्रिणींकडून मिळालेली खास चीजवस्तू असो, नोकरीत बॉस आणि कलिग्स कडून मिळणारा पार्टी वेअर टीशर्ट असो, किंवा मग लाइफस्टाइल किंवा शॉपर्सस्टॉप वगैरेंची व्हाऊचर्स असो. हे सगळे दृश्यं स्वरूपातील 'GAINs' म्हणता येतील. पण त्या पलीकडेदेखील दरवर्षी होणारी भावनिक, वैचारिक वाढ -  सांस्कृतिक प्रगल्भता, दर २ महिन्यांतून घेतली/वाचली जाणारी पुस्तके जाणारी पुस्तके, कळत-नकळत  समोरच्याच्या चांगल्या गुणांमुळे ते शिकून घेण्याची जिद्द,  अडल्या माणसाला शक्य तेवढी मदत करण्याची प्रवृती, आणि आजवरच्या काळात माझ्या आर्थिक, नैतिक, सामाजिक, राजकीय, अश्या अनेक पैलूंनी  माझ्या शिक्षणात भर घालणाऱ्या प्रत्येकाचे चेहरे आजही मनाच्या पडद्यावर तरळून जातात.


सिग्नलला भर पावसात गाडी बंद पडलेल्या शेजारी बायको बसलेली आणि मागे असंख्य हॉर्न वाजवणारे, बोंबा मारणाऱ्या लोकांमुळे 'सॉरी सॉरी' म्हणत भांबावलेल्या माणसाला मी माझी बाइक साइडला लावून गाडीला धक्का मारून दिला. गाडी चालू झाल्यावर पावसात पूर्णं भिजत खाली उतरून त्याने कृतज्ञतेने म्हटलेल्या एका 'थँक्यु', व अशा एक ना अनेक क्षणांमुळेमला वेताळ पंचविशीतील एक वर्ष कारणी लागल्यासारखे वाटते.

आज सकाळी सकाळी बायकोने २८ उकडीच्या मोदकांचे तबक समोर ठेवले  (अत्यंत कलात्मक पद्धतीने बनवल्याबद्दल माझ्या मावशीचे आभार),
आईने औक्षण केले आणि एक सोनेरी कडांचे पाकीट हातात ठेवले,

आजीने देखील विचारले - मी काय देऊ बाबा तुला ? काहीतरी देणारच, पण त्यातल्या त्यात ज्याची गरज आहे आणि जे हवेसे वाटते ते द्यावे, निदान केक तरी देते मी.

  
मी म्हणालो - 'तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेतच, ते तसेच राहू द्या, वेताळ भेटेलाच तर त्याच्याकडून आयुष्यातली ही वर्षे परत मागून घेताना कामी येतील" !!