Thursday, November 26, 2015

अ-सहिष्णू दहशतखोर - (माझ्या चश्म्यातुन) !!

बायकोला ऑफिसला सोडून परत घरी येत होतो...  
एका हॉल शेजारून जाताना वस्स्कन " भ्याँं....." असा आवाज आला... काय घाबरलो राव मी ! 
मला वाटलं अलिफ़ लैला, हातिमताई मध्ये असतो तसा जीनं किंवा राक्षस प्रकट होतो की काय !! घाबरल्यामुळे गाडी आपोआप रस्त्याच्या कडेला आलेलीच होती, म्हणून स्टँड वर लावणार  इतक्यात परत तोच भयानक आवाज !!!

कसाबसा धीर करून हॉल मधून आत डोकावलो तर अनेक वेगवेगळ्या वयाची आणि आकाराची माणसे योगासने करत होती आणि त्यात सिंह-मुद्रा आसनप्रकाची प्रॅक्टिस करत होते !! आवाजाहून भेसूर होत जाणार्या  त्यांच्या मुद्रा पाहता मी तिथे एक क्षणभर न थांबता लागलीच बाहेर पडलो !!

मला एक कळत नाही, समोरच्याला घाबरवण्यात असा काय आनंद मिळतो   ? हे गायक लोक, योगासनं करणारे, पहाटे ४-५ ला रस्त्यावर चक्कर मारत व्यायाम करणारे लोकं, सर्वसाधारण आजूबाजूच्या लोकांना आपली भीती वाटू नये ह्याची काळजी घेऊन अंग/तोंड विक्षेप का करत नाहीत ??

एखादे अत्यंत थकलेले आजी आजोबा, आपल्या घराजवळ चक्कर मारायच्या ऐवजी २-३ फर्लांगभर लांब फिरायला जातात... बरं चालता चालता हातातल्या काठीला टेकून किंवा एखादी रिक्षा/गाडीचा आधार घेऊन असे काही उभे राहतात की समोरून येणाऱ्या माणसाच्या मनात १०१ विचार १ मिनिटात येऊन जावेत !! 
समजा तुम्ही त्यांना मदत करून इच्छितं स्थळी पोचवले (माणुसकीला धरून त्या वेळेत तुमचा किती वेळ गेला ह्याची तमा न बाळगता... )  तर दुसऱ्या दिवशी त्याच वेळी त्याच स्थळी तेच गृहस्थ/आजीबाई तुमची अगदी वाट पाहत असल्यासारखे दिसतात   !  

कधीतरी तुम्हाला बाहेरगावी जाताना पहाटेच उठावे लागते, हातात एक आणि पाठीला एक अश्या बॅग घेऊन आपण बस/रिक्षा शोधण्यासाठी फुटपाथवरून चालताना समोरून येणारे कर्नल/डॉक्टर/VRS घेतलेल्या लोकांच्या पैकी एखादा इतके हातवारे करत येत असतो की आपण स्वत:हून बाजूला होऊन हा रणगाडा आधी जाऊदे मग आपण जाऊ हा पवित्रा घेतो !

मध्यम-वयातली लोक उगीचच सरळ चाल, उलटे चाल, मोठ्ठे मोठ्ठे श्वास घे...घाम न पुसता तसेच इकडे तिकडे फिरणे... असे करून लक्ष वेधून घेत असतात...

सगळ्यात मोठा ताप म्हणजे खिशात कालची शिळी पोळी, घरात उरलेले न खपलेले बिस्किटांचे तुकडे घेऊन सर्व भटक्या कुत्र्यांचे माय-बाप होण्याचा प्रयत्न करणारे लोक !!
हि कुत्री महानगरपालिकेची श्वानपथक गाडी अशी underground होतात की जणू कंप्लेंट केलेल्या माणसालाच तो ठेकेदार शिव्या देणे बाकी ठेवतो... पण सकाळचे हे माय-बाप लोक आले की सगळी गँग जमा होते.... 
पुढे ३ मागे ४ असे लटांबर घेऊन दर ३०० मीटरमागे १-२ बिस्किटे फेकत ह्या लोकांचा ताफा पुढे जात असतो.... बरं, बिस्किटे तरी भरपूर आणावी... ते हि नाही, १ पुडा संपल्यावर पुन्हा ही गँग बेवारस होते... आणी मग काय विचारू नका.

दुधासाठी जाणारे, ऑफिसला जाणारे, ज्या कोणाच्या हातात पिशव्या दिसतील त्यांच्या मागे सगळी हुंगत फिरायला लागतात... 
माझ्या मते आधारासाठी वापरण्यात येणाऱ्या काठीची सुरुवातच ह्या मल्टिपर्पस योजनेतून झाली असावी !

जी गत सकाळी, तिच संध्याकाळी....तुम्ही ज्या रस्त्यावरून जाणार त्याच्या बरोब्बर समोरून एखाद्या दारूच्या गुत्त्यावरून सुटून तर्राट झालेला माणुस झिंगत झिंगत येत असतो...... आता हे हेलिकॉप्टर नेमकं आपल्यावरच क्रॅश लँडिंग करणार ह्या भीतीने लोक रस्ताच बदलतात.... ! बायका-पोरी तर ही पिडा जाईस्तोवर सरळ एखाद्या शेजारच्या दुकानात घुसून उगीच काहीतरी घेतल्या-बघितल्यासारखं करतात  . आणि बाकी लोक शेवटच्या सेकंदात लिफ्ट बंद होताना जसे पटकन आत घुसतो तसे चटकन त्याला चुकवून पुढे जातात. !

ह्याव्यतिरिक्त अजून घाबरवणाऱ्या लोकांमध्ये, लाल सिग्नल असतानाही मोटारसायकलची ऍक्सलेटर पिळत उगीचच आत्ता उडवू की नंतर उडवू असे आविर्भाव करणारे लोकं, सिग्नल लागला रे लागला की पावती पुस्तक आणि पेन झटकत पुढे येणारा ट्राफिक हवालदार, उगीचच टेहळणी करण्याचा भाव आणणारा भंगारवाला / फेरीवाला, आपण मेडिकल टेस्ट किंवा X-RAY काढल्यावर तो परत देताना विनाकारण उघडून बघत चित्र-विचित्र सुस्कारे टाकणारे रिसेप्शनिस्ट्स, आजच्या एपिसोडमध्ये कोणता सामाजिक मुद्दा कश्या प्रकारे सीरियल मध्ये गोवला जाईल हा विचार करणारा कथेचा लेखक इ. इ. !

एकूण काय तर असले असंख्य आधुनिक अ-सहिष्णू दहशतखोर आपल्या आजूबाजूला फिरताना भीती वाटणे हे साहजिकच आहे ...  ह्यावर उतारा म्हणून एकवेळ "विषय" सोडू असे म्हणणे ठीकं आहे पण देश सोडू म्हणणे म्हणजे अगदी काहीही हं श्री होतयं !! 

Wednesday, November 25, 2015

एकतीशी कडे वाटचाल.....

नेमेची येतो वाढदिवस"... लोकांसाठी एक वर्ष पण खऱ्या अर्थाने झालेली वाढ हि फक्त स्वतःला माहित असते !! तसे मागच्या वर्षीपासुनच (तिशीमध्ये आल्यावर) एकतिसाव्या वर्षात पदार्पणाबद्दल मनात खुप सारे विचार होते, त्या विचारांच्या तंद्रित एक छोटीशी लिस्ट देखिल बनवली होती मी, की ३० Things before i turn ३० !! 

त्यातल्या बहुतांश तर पुर्ण केल्या आहेत काही बाकी राहिल्यात, पण सगळ्याच योजना पुर्ण झाल्या तर नवीन योजना बनवण्याची गम्मतच निघून जाईल... त्यामुळे ज्या पुर्ण झाल्या त्यात थोडेसे माझे कसब, तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट आणि ज्या अपुर्ण राहिल्या ती "श्रीं"ची ईच्छा !! 

मागच्या वर्षभराचा लेखाजोखा मांडताना एक लक्षात आले की तिशी च्या सुरवातीलाच आपण बरीच नकारघंटा लावली होती,  AGE BAR, जॉब Change limitations, वगैरे.... ! 
पण अगदीच असे काही नाहिये, अनेक यशस्वी आणि मोठ्ठ्या लोकांनी त्यांच्या आयुष्य्याची सुरुवात तिशीनंतर केली आहे, उदाहरणार्थ - सिल्वेस्टर स्टॅलॉन(ऍक्टर). ओपरा विन्फ़्री (टॉक शो) ह्या लोकांना खरा सुर गवसला तो ३० वर्षांनंतरच !  एका ईटरव्यू मध्ये स्टॅलॉन म्हणाला होता की,  Remember, Its never too late to start something !!  
त्यामुळे आता पुन्हा आपला दिमाग जैसे थे वर आला आहे... आणि त्याच जिद्दीने आणि ध्येयाने पुढिल वाटचाल Positively  करणार  !!  

ह्या वर्षीचा वाढदिवस "एक उनाड दिवस" प्रेरित होता, कंपनीकडून "ADLABS IMAGICA" चे पास मिळालेले होते त्यामुळे संपुर्ण दिवस उनाडक्या करण्यात गेला,  मज्जा आली !!
एफ.एम रेडिओ च्य रेड एफ एम मधून सुद्धा -वाढदिवसासाठी फोन आला होता - felt very Special by Wifey's this effort !!  


मागच्या लिस्टप्रमाणे श्रेयस तळपदे, पुजा सावंत, अनिकेत विश्वासराव, राहुल सोलापुरकर आणि अश्या अनेक Celebrities ला भेटलो पण अशोक सराफ ह्यांच्याशी झालेली भेट आयुष्यभर लक्षात राहिल !!

ह्या वेळी वाढदिवसाचे मनोगत लिहायला खुपच वेळ लागला खरा. . . . Matter तयार होता पण लेखन होत नव्हते... असो ह्या वर्षीप्रत्येक महिन्याला एक Article तरी लिहिणार आहे !! 

वेताळा, ठरवलेल्या गोष्टी निट पार पडुदे रे महाराजा.....
विघ्न दूर कर आणि लढायची ताकद दे रे महाराजा...... !!   (होय महाराजा !!!)

Monday, March 2, 2015

मै चिली... मै चिली.... !!

"गणपती बाप्पा.... मोरया...." विमानतळाकडे निघालेल्या गाडीपुढे नारळ फोडताना न विसरता ह्या विघ्नहर्त्याचा जयघोष होतो, आजकाल कसलीही गॅरेंटी न मिळण्याच्या जमान्यात एवढी एकच काय ती अबाधित गोष्ट आहे !  २-३ नारळ अजून आणले होते, खरं तर ते घरी वापरासाठी होते पण जाई जाईपर्यंत विनोद आणि फिरक्या घेणाऱ्या आमचे मित्र मंडळी आई बाबा आत गेल्यावर म्हणाले , "अरे घेऊन जा ते नारळ पण आणि प्रत्येक विमानासमोर पण फोड.... च्याआयला आणि MH नंबर असेल तर भाई स्किप करून Next Flight घे!   पोचल्यावर कळव इथं काही लागलं तर आम्ही आहोतच ! Go Safe...Come safe !"

खरं तर आठवड्याभरात "सांतिआगो दे चिली" ला जावे लागेल असे सांगितल्यापासूनच  घरचे सगळे 'आनंद आणि टेन्शन' च्या बॉर्डरलाईनवर होते. इतक्यात येणाऱ्या  FLIGHT CRASH च्या बातम्यांमुळे आणि मुख्य म्हणजे त्याचा विश्लेषणामुळे बहुतांश सगळेच ट्रॅव्हलर्स आणि त्यांची कुटुंबे चिंतातुर असणार, पण काय करणार - SHOW MUST GO ON !!

"सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे आ गयी..." ऑनसाईट जायची वेळ असेल तर हे गाणे आवर्जून ऐकतो. माणूस फक्त स्वतःची तकदीर घेऊन जातो असे ऐकले होते. इथे आमची तकदीरच आम्हाला इकडे तिकडे घेऊन जात असते.  आधी कॅनडा आणि आता साऊथ अमेरिका !!  व्हिसा आला, तिकिटे आली, आणि २३ किलो खान-पान आणि उरलेल्या सामानात लॅपटॉप आणि कपडे अश्या मागच्या वेळेस केलेल्या तयारीचा आम्हा सगळ्यांना पुनःप्रत्यय आला ! "ऑनसाईट" चा पहिला अनुभव गाठीशी होताच, अगदी 'त्याच तिकिटावर तोच खेळ' चा प्रत्यय आला. मी स्वतः ट्रीप असो किंवा कोणाकडे जायचे असो - कधीही प्लॅन केल्याशिवाय जात नाही ! आणि अश्या ह्या माणसाला ६ दिवस आधी व्हिसा मिळतो, ३ दिवस आधी तिकिट मिळते आणि २ दिवसात सगळी तयारी करून छू मंतर !!!

लोकसभा इलेक्शन्स च्या वेळी आणि शपथविधी नंतर "मोदींचे दौरे" ह्या मथळ्याखाली त्यांनी केलेला प्रवास अत्यंत तपशिलाद्वारे मांडला जायचा... मी रोज वाचायचो.
त्याच अनुशंघाने सांगतो की मी देखिल ह्यावेळी  पुणे ते दिल्ली, दिल्ली ते ऍमस्टरडॅम , ऍम्स्टरडॅम ते अर्जेंटिना आणि अर्जेंटिना ते चिली असा साधारण १०हजार मैलांचा प्रवास सुखरूप पूर्णं केला.
ह्यावेळी पहिल्यांदाच विमानातून सुर्यास्त पाहिला... !
(PS:- दिल्ली पेक्षा पुणे एअरपोर्ट किमान २०० पटीने चांगला आहे ! ६ तासात वैतागलो तिथे)

ह्यावेळी एक अनुभव पाठीशी असल्यामुळे आम्ही विदेश-वीर झाल्याच्या आविर्भावात निघालो होतो आणि सगळे कसे अगदी सवयीचे वाटत होते. सहज मनात विचार आला की एकाच बँड/लेव्हल मध्ये काम करणारे ३००० लोक - प्रत्येकाची कामाची पद्धत, अनुभव आणि चेहरे वेगवेगळे ! नेहमी "टॅलेंट" हाच निवडीचा निकष असू शकत नाही हे तर आजकालच्या कॉर्पोरेट मध्ये काम करणाऱ्या फ्रेशर ला सुद्धा माहीत असते. पण तरीही प्रत्येक जण "उम्मीद पे दुनिया कायम है" म्हणत काम करत असतो  किंवा निदान काम करत असल्याचे दाखवत तरी असतो ! कोणा एकाची किंवा काहींची निवड झाल्यावर इतरांना काय वाटते हे देखिल जगत्जाहिर असते...पण ह्यापेक्षा खुद्द त्या माणसाला काय वाटते हे महत्त्वाचे !

आत्मपरीक्षणात खूप ताकद असते-"You are the Chosen one" !  98% of humans are happy when they hear this line. 2% are those who look beyond these lines... at the new horizon...new challenges....dont let it waste...Its time to move on..! "हम-दोनो" आठवतोय ? मेजर वर्मा च्या भाषेत "इंसान के अंदर का लोहा अपनी चमक दिखाने के लिये मौके की तात मे रहता है"!!- This is the best time to show your INSIDE out... ! When you have unknown people around you...let the BEST PART Be come out....Make it Big !! Its a Show time :-)

माझ्या मते परदेशात पाऊल ठेवल्यावर लगेच  शिस्त, नीटनेटकेपणा, स्वच्छता आपोआप अंगकारली जाते ह्याचे कारण म्हणजे जर हे केले नाही तर मोठी किंमत चुकवावी लागेल हा "धाक" ! माझ्या दोन्ही देशांच्या प्रवासात मी अनेक INDIANs पाहिलेत जे तिथे नीट वागतात पण मुंबईत आल्या आल्या बाहेर येऊन च्युइंग-गम रस्त्यावर थुंकतात, पाण्याची बाटली  कार पार्किंगमधल्या झाडात फेकतात ! अर्थात परदेशातही असे लोक आहेत..
निदान चिली मधल्या "सांतियागो" शहरात मध्यरात्री भटकताना मी असे अनेक गर्दुल्ले, बेवडे पाहिले जे आपापल्या मैत्रिणींसमवेत ह्या सगळ्या किंवा ह्याहूनही विचित्र गोष्टी भर रस्त्यावर करत होते. येथेदेखील  "बेलाविस्ता" नामक एरिया आहे जिथे  आपल्याकडच्या कोरेगाँव पार्क किंवा संध्याकाळी ९ नंतर नदिकिनारी/बावधन चौपाटी/बँडस्टँड ला होते तशी गर्दी होते  Its basically YOUTH !!....कॅफे, बार, पब किंवा हॅपी स्ट्रिट वर मध्यमवयीन किशोरवयीन लोक मुक्तपणे वावरत असतात..  गिटार आणि बँड च्या तालावर तोंडातून आगिचे खेळ करून दाखवणारी एक २ मुली आणि ३-४ मुले आम्ही पाहिली, जी मिळेल ती टिप घेऊन पुढे जायचे.... येथेदेखिल Show Must Go On... ! पोलिस बंदोबस्त मात्र भरपुर होता... तिथल्या लोकल माणसाने सांगितले पोलिस सतत फिरत राहतात म्हणून तर सगळ्ञांचे स्वातंत्र्य (की स्वैराचर?) अबाधित आहे, लोक मुक्त राहावेत ह्याकडे पोलिस जातीने लक्ष देतात आणि गैरप्रकार दिसताच कारवाई करतात !


सांतिआगो हे दक्षिण अमेरिका खंडात चिली देशातले त्यातल्या त्यात सुंदर आणि Crime फ्री असे हे एक शहर !  इथवर पोहोचण्यासाठी तुमच्या विमानप्रवासाची कसोटी लागते... ९.५ तासांचा नेदरलँड आणि तिथून १४ तासांचा चिलीपर्यंतचा प्रवास - कोणतेही छंद नसलेल्या माणसाला कमालीचा वैताग देऊ शकतो ! परंतु आईकडून मिळालेली संगीताची आवड आणि बाबांमुळे लागलेले वाचनाचे वेड घेऊन मी हा सगळा प्रवास पुस्तकं आणि मोबाइलमधले देव आनंद/आर डी/ हेमंत कुमार/ आशा/ लता/ वपु/ पु. /द. मा ह्यांच्या साथीने मोठ्या आनंदाने पार पाडला....! 
चिली विमानतळावर टॅक्सी ड्रायव्हर आलेलाच होता, हॉटेल मध्ये पोचताक्षणी रिसेप्शनिस्ट ने  (माणूस होता) हसून स्पॅनिशमध्ये स्वागत केले आणि रूमच्या  किल्ल्या हाती दिल्या ! 
१५ व्या मजल्यावरची एक प्रशस्त रूम - किचन, हॉल आणि बाल्कनी + एक मास्टर बेडरूम. बाल्कनीत आल्या आल्या निम्म्या इलाक्याचा ARIAL VIEW,  'कोस्टानेरा सेंटरची' सर्वांत उंच इमारत  आणि समोर बर्फाची टोपी घालून दिसणारी दिमाखदार ANDY's ची भली मोठी पर्वतरांग.  वाह ! लाईफ हो तो ऐसी !

ह्यावेळेसच्या हॉटेलमध्ये रेडीमेड ब्रेकफास्ट नव्हता.. दर सोमवारी "रॉ" मटेरिअल आणून दिले जायचे जसे की विविध ज्यूस, अंडी, ब्रेड, भाज्या, फळे.. आपापला पाहिजे तसा ब्रेकफास्ट बनवा आणि खा... !

पुन्हा एकदा आई-बायको-बहीण आणि बाकी सर्व स्त्रीसमाजाला मनापासून धन्यवाद आणि सलाम- एक कळकळीचा आग्रह - तुमचा नवरा, मुलं, भाऊ जर तुम्हाला स्वयंपाकघरात मदत करत नसतील तर आवर्जून मदत करायला सांगा ! Handling KITCHEN is not an easy TASK.... !! Get help even if you don't want... it makes others to realize the pain and procedure !!

लोकांनी गूगल ट्रान्सलेटर ला कितीही शिव्या देवोत पण माझ्यासाठी वरदानच ठरले. इथे बहुतांश सगळेच लोक 'स्पॅनिश' बोलतात. इंग्रजी अगदीच नावाला, त्यामुळे ह्या ट्रीप मध्ये खऱ्या अर्थाने माझा सोबती हा माझा लॅपटॉपच ! हॉटेल आणि ऑफिस मध्ये साधारण ६-७ किलोमीटर चे अंतर होते, ऑफिसचे सगळे लोक बहुतांश एकाच टॅक्सी ड्रायव्हर सोबत फिरायचे कारण त्याला थोडे इंग्रजी येत होते आणि तो फोन वर कायम Available  असायचा! ("ऑन कॉल सपोर्ट")

आठवडाभर लोळून काढल्यावर निष्कर्मतेचा पण कंटाळा येतो आणि मग परदेशात परप्रांतात बिनधास्तपणे वेगवेगळे रस्ते गल्ल्या पादाक्रांत होत जातात. हॉटेलजवळच्या मेट्रो/पार्क्स/शॉपिंगमॉल्स/बस स्टॉप्स भरपूर हिंडून झाले. इथे साधारण बहुतेक सगळ्याच इमारतींसमोर सजावटीत भर टाकणारी काही ना काही Monuments होती -ती पाहून खूपच छान वाटले. मेट्रो जेव्हा सेकंदात वेग घेते तेव्हा आतला माणूस पुढे मागे खूप हेलकावतो, त्या सेकंदाला कॉलेजमध्ये शिकलेले "PHYSICS" चे सगळे नियम आठवले.


सांतिआगोमध्ये सूर्योदय पहाटे ५.३० च्या आसपास आणि सूर्यास्त मात्र रात्री ८.३० पर्यंत होतो. (किंवा मी उन्हाळ्यात गेल्यामुळे असेल). सकाळी उठल्या उठल्या ग्लासभर ज्यूस पिऊन पळत पळत १ किलोमीटर वर राउंड मारून यायचो - एकदम फ्रेश ! ६.३० ला परत येऊन आरामात सोफ्यावर लोळत लॅपटॉप चालू करून ईमेल्स लोड करून घ्यायच्या आणि ९ पर्यंत अंघोळ/ब्रेकफास्ट आवरून ऑफिसला रेडी !! 
आमचा 1 टॅक्सी ड्रायव्हर होता पाब्लो नावाचा. त्याने त्याचा "पाब्लो'ज इंडियन अमिगोस" नावाचा व्हाटसऍप ग्रुप बनवलेला आहे. सगळी कामे तो फक्त एका पिंग वर करतो. तो खाली आलेला असायचाच, टॅक्सी शेअर करून आमची वारी ऑफिसला निघायची. अमजदखान चा भाऊ शोभेल असा हा पाब्लो जाता जाता शक्य तेवढे रस्ते, दुकाने, शहराबद्दल माहिती पुरवायचा. ह्या एका माणसामुळे आमचा प्रवास आणि निवास दोन्ही बऱ्याच प्रमाणात सुखकर झाला होता ! 


कस्टमर साईट वर मरणाचं काम असतं आणि भयंकर रिस्पॉन्सिबिलिटी असते असे ऐकलेले होते, ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. क्लाएंट डोक्यावर बसून काम करून घेतो म्हणतात ते काय असते ते कळते !! हँ पण १२ तासांचा शिफ्ट सपोर्ट झाल्यावर उरलेला वेळ कसाही घालवा. तुमच्या मिनिटांचा हिशेब जेव्हा फक्त तुमच्याकडेच असतो तेव्हा २४ तासांचा दिवसदेखील कमी वाटतो... किती करू आणि काय करू असे होते. 
मी पहिले १५ दिवस मस्त मनसोक्त पायी भटकलो, आराम केला, स्वयंपाक केला ! १५ दिवसांनंतर अजून २ लोक सपोर्ट साठी आले, त्यात एक नव्याने मित्र झालेला आणि एक जुनी मैत्रीण त्यामुळे मग आमचा ग्रुप मस्त जमला... एकत्र जेवण, एकत्र फिरणे आणि एकत्र भरपूर काम करणे!
पहिले १५ दिवस "बनेल ते" ह्या तत्त्वाने होणारे जेवण हे लोक आल्यावर एकदम "इंडियन तडका" स्टाइल झाले   मैत्रीण पोळ्या करायची आणि आम्ही सगळे भाजी/चिकन/भुर्जी ची बाजू सांभाळायचो... साधारण ११-११.३० ला जेवण झाल्यावर शतपावली करून मध्यरात्रीपर्यंत आपापल्या रूम मध्ये निवांत परतायचो !


अर्थात सगळे वेगवेगळ्या टीम मध्ये असल्याने "Week Off" एकत्र नसायचे, पण मग हाजिर तो वजीर च्या नियमाने आम्ही आळीपाळीने शॉपिंग मॉल्स,समुद्रकिनारा, DownTown (म्हणजे थोडक्यात तुळशीबाग/लक्ष्मीरोड) ला फिरून यायचे... समुद्रावर माझे २ वेळा जाणे झाले - पहिल्यांदा गेलो तेव्हा एक मित्र त्या आठवड्यात भारतात परतणार होता म्हणून त्याला कंपनी द्यायला गेलो... आम्ही सगळे PACIFIC च्या क्रेझ ने पोहूया विचार करून निघालो होतो.. पण हवामान एकदम बदलले, सूर्य झाकोळला आणि थंडीचे दवबिंदू काचेवर/अंगावर पडायला लागले त्यामुळे पॅसिफिक मध्ये फक्त पाय बुडवून परतलो !! बर्फासारखे थंड पाणी होते, तरीही लहान लहान मुळे मजेत खेळत होती - तिथे पुन्हा एकदा माझा 30 Things before i turn 30 हा लेख आठवला..फक्त ६ महिने राहिले तिशीला..  असो !
दुसरे कारण म्हणाल तर एवढ्या थंडाव्यात गेलो असतो तर आजारपण येण्याची शक्यता होती त्यामुळे भलती धाडसे केली नाहीत पण माझी जी मैत्रीण नंतर आली होती, तिच्यामुळे मी भारतात यायच्या फक्त १ दिवस आधी पुन्हा तिथे जाण्याचा योग आला आणि सुदैवाने हवामान मस्त होते. स्वच्छ सूर्यप्रकाश पण पाणी तरीही थंडच होते. कसेबसे कमेरेपर्यंत पाण्यात गेलो. खरंच सांगतो - पाय पूर्णं थिजले होते... संवेदना नाहीश्या झाल्या होत्या... (3rd Degree मध्ये बर्फाच्या लादिवर झोपवतात म्हणे... काय वेगळा अनुभव असणार मी अनुभवत होतो त्यापेक्षा)  आणि तेवढ्यात अचानक एक जोरदार लाट आली आणि त्या तडाख्याने आम्ही अक्षरशः फेकले गेलो.... लाट परत जाताना वाळूचे कण शेकडो ओरखडे काढत होते ! त्या धक्क्यानंतर मात्र पूर्णं भिजलेले असल्यामुळे की काय पण थंडी कमी झाली आणि आम्ही तासभर निवांत समुद्रात बागडलो.
विश्वास बसत नव्हता की पृथ्वीच्या अश्या टोकावर उभा आहे जेथून पुढे अथांग पाणी... जर जमीन शोधायची म्हटलं तर पलीकडचा तीरावर थेट ऑस्ट्रेलियाच !!

अंग सुकेस्तोवर वाळूतच बसून होतो, अनेक लोक बागडत होते, ऊन खात होते, फोटो काढत होते. भलतीच ओपन संस्कृती असल्यामुळे आपल्याला ज्याचा विचार करायला देखील धाडस लागते अश्या अनेक गोष्टी समोर घडत होत्या  पण असो..
देश त्यांचा, लोकं त्यांचे, संस्कृती त्यांची..... त्यामुळे बाकीच्या अनेक सुंदर गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित केले.. समोर PACIFIC  चे विशाल पात्र डोळ्यात मावता मावत नव्हते... Nothing like PACIFIC हे खरेच आहे....
समुद्राच्या पोटात काय काय दडलेले आहे हे जाणून घ्यायचे कितीतरी प्रयत्न झाले असतील पण समुद्राच्या तटावर उभे राहून तरी, ही दृष्टीआडची सृष्टी मला कायम गूढं आणि अगम्य वाटते... का कोणास ठावूक पण काहीतरी आहे जे आपल्या कल्पनेच्या किंवा अधिकारच्या पलीकडे आहे ही जाणीव झाली आणि आपोआप हात जोडले गेले.. ह्या अथांग शक्तीपुढे तर खुद्द श्रीरामानेदेखील लंकेत जाण्याआधी प्रार्थना केली होती, मग आमची काय कथा !


वल्परायझो आणि विना-देल-मार ह्या शहरांमध्ये भटकताना अनेक गोष्टी पाहिल्या. पाब्लो नरुला नावाच्या नोबेल विजेत्या साहित्यिकाचे घर, छोट्या छोट्या टेकड्यांवर बांधलेली घरे, 

डॉकयार्ड, मंडई, तुळशीबागेची आठवण करून देणारी रस्त्यावरची दुकाने,  इलेक्ट्रिक ट्राम्स, चिझ पोटॅटो, चिलीमधले लोकल Music, फुटपाथव्यवसायिक, स्ट्रीट आर्टिस्ट्स - (भिकारी नाही पण सिग्नल ला खरेच आपली कला दाखवून पैसे मागणारे लोक)- तिकडे लोक एक बादली, साबणाचा फेस असलेली बाटली आणि ओले कोरडे फडके घेऊन उभे असतात. सिग्नल लागल्यावर एखाद्याने हॉर्न वाजवला की लगेच पळत तिकडे जातात - न बोलता त्याच्या गाडीची पुढची मागची काच १५ सेकंदात साफ करतात, तो जी देतो ती टिप घेतात आणि "ग्रासिएस" म्हणून सिग्नल सुटायच्या आत परत होते तिथे पोचतात !!
कमाल आहे हे असं काहीतरी पाहिजे... नाहीतर आपल्या सिग्नल ला पहा, एखादा ४-५ वर्षांचा मुलगा, सिग्नल लागताच २-३ लोखंडी रिंगा रस्त्यावर आपटतो.. एकामागोमाग एक रिंग ह्या हातातून त्या हातात घालून पायातून काढतो... मग टोपीला दोरी आणि दगड लावून ती हेलिकॉप्टर सारखी फिरवीत अत्यंत हिडीस चेहरा करत जवळ येऊन मांडीला, कपड्याला, गाडीला हात लावून पैसे मागतो !! शी !!  असे वाटते की काय हा फालतूपणा ! असो, तुलना करत राहिलो तर पुढील लेखन अवघड होईल. 

वल्परायझो मध्ये तर शहरांत संपूर्ण रंगरंगोटी केलेली होती,
वेगवेगळ्या स्ट्रीट पेंटर्स ने आपापल्या हिशेबाने आपली बाहेरील भिंत किंवा दुसऱ्यांची भिंत सुशोभित करण्याचा प्रयत्न केला होता.. 
एक माणूस तर नुकताच त्याची भिंत रंगवताना दिसला आम्हाला ! ती सौदर्यदृष्टी पाहून डोळे प्रसन्न झाले. ह्या शहरांचा फेरफटका करून सूर्यास्ताच्या आत परत आलो. अंघोळ उरकून मस्त फ्रेश झालो आणि चहा घेऊन गॅलरीत पाय पसरून बसलो !


मी आणि मागाहून आलेल्या माझ्या मैत्रिणीने तिथे गेल्यावर एक ठरवले की "चिलीमधला शेवटचा दिवस" असेल त्या व्यक्तीला स्वतःचे जेवण बनवायला लागू नये! म्हणून मग आम्ही मिळून जेवण बनवायचो. त्याला फक्त रूम मध्ये येऊन खायचे काम ! शेवटच्या दिवशी तरी निवांत राहावे हा उद्देश  - असे ३-४ लोकं आमच्यासोबत जेवले आणि जाताना अनेक धन्यवाद देऊन गेले !!  अर्थात मी भारतात लवकर परत आल्याने  माझ्यासाठी तिने बनवले. पण ती आणि तिच्यासोबत परतणाऱ्या मित्रासाठी कोणी बनवले असेल की नाही.. Dont know :D !  काश, बाहेर जाणारा प्रत्येक जण असा एक जरी विचार जोपासू शकला असता तर अनेकांचे ऑनसाईट चे अनुभव अजून सुखद झाले असते !

 चिली ते अर्जेंटीना हा प्रवास करताना खिडकी Miss करू नका...
ANDY's च्या पर्वतरांगांचे  फॅंटॅस्टिक दर्शन घडेल, महिनाभर नॉर्मल तापमानची सवय झाल्याने ऍम्स्टरडॅम ला मात्र जाता येता वाट लागली होती,
-५ डिग्री Temp ला तोंडातून वाफा निघताना पाहून अजून एखादे जॅकेट चेक-इन बॅग ऐवजी हातात घेतले असते तर बरे झाले असते असे वाटले ! विमानात बसेस्तोवरदेखील हात पाय गार पडले होते. खरं तर परत येताना असे वाटले होते की सगळ्या बॅग रिकाम्या होतील आणि हात हलवत परत येऊ... पण चॉकलेट्स, खरेदी, उरलेले कपडे ह्यांचे वजन Approximately तेवढेच झाले जेवढे चिली ला जाताना नेले होते !  जेवण मैत्रिणीकडे झाले असले तरी बॅग्स पॅक करणे हा मोठा टास्क बाकी होता...२-३ वेळा बॅग भरून पुन्हा काढून मग वजन करून अगदी SysTematically Arrangements केल्या. ह्या सगळ्या प्रकारात रात्री २ कधी वाजले कळले देखील नाही. पण ती मेहनत फळाला आली, कारण पुण्यात येईपर्यंत बॅग आणि सामान तसेच्या तसे राहिले होते!


महिनाभराची Assignjment संपली- तिथल्या सगळ्यांना "Thanks & Bye" चे इमेल पाठवले, तिकिटाची प्रिंट/बॅग तपासल्या आणि हॉटेल सोडले..
विमानतळावर नेण्यासाठी पाब्लो आला होताच, विमानतळावर पोचल्यावर चेक-इन बॅग सुपुर्त केल्यावर Boarding Announcment  ची वाट पाहत हेडफोन्स घालून मी देव आनंदसोबत गुणगुणू लागलो 'आसमाँ के निचे... हम आज अपने पिछे... प्यार का जहाँ बसाँ के चले.. कदम के निशान बना के चले" !

मुंबईवरून पुण्याला आलो तेंव्हा घरी स्वागताला बाबा, आजी, बायको सगळे सज्ज होतेच - आईशी फोनवर बोलत होतोच,
माझ्या कॅबचा हॉर्न ऐकून बाबांनी दार उघडून लगेच BIRTHDAY BASH चे झिरमिरित फटाके उडवले, बायकोने ओवाळले, आजीने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला आणि महिन्याभराच्या चिली ट्रीप नंतर आमचा दणक्यात गृहप्रवेश झाला.... !!




हुश्श... ! आलो बाबा एकदाचा सुखरूप.  आज हा लेख लिहिताना पुन्हा एकदा Virtually चिली ला जाऊन आलो, कॉर्पोरेट लाईफमधला अजून एक लाईफटाइम इव्हेंट संपला.  इथे रात्रीचे २ वाजलेत पण तरी चहाची हुक्की ली आहे... एक कप पितोच !  कारण लेख लिहिताना एवढे Brain Storming झाल्यावर आता अंतर्मन पुन्हा उड्या मारायला लागले आहे.  कॅनडा झाले...साऊथ अमेरिका झाले... Whats Next ??

Saturday, January 10, 2015

निळे पाणी, सेल्युलर जेल आणि अनेक अविस्मरणीय आठवणी !!


स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळावर गो-एअर च्या विमानातून उतरल्या उतरल्या पाय टेकायच्या आत मी त्या भूमीला नमस्कार केला. आजकाल सगळे 'मोदी'फाईड झाले आहेत... आणि चांगल्या गोष्टी कॉपी करायला आपण तर घाबरत नाही बुवा !!तिकडचे फ्लाईट-अटेंडंट/सिक्युरिटी गार्डस "हे काय भलतेच" असे माझ्याकडे पाहत होते....त्या बिचाऱ्यांना काय माहीत अंदमान बद्दल बाहेर जगात काय काय आठवणी आहेत.....पिकतं तिथे विकत नाही हा नियम सगळीकडेच लागू होतो.. अगदी त्यागासाठी सुद्धा !


अंदमान ला पोचलो तेव्हा थोडासा पाऊस पडून गेला होता, गाईड कडून समजले की इथे दिवसभरात तीनही ऋतू पाहायला मिळू शकतात एवढे चंचल हवामान आहे, आणि त्सुनामी नंतर तर हवामानाचा लहरीपणा जास्तच वाढलेला आहे. हॉटेल मध्ये फ्रेश होऊन जेवण करून आमचा ताफा अंदमानचे राजनैतिक माहात्म्य आणि आता सध्या राष्ट्रीय स्मारक असलेल्या "सेल्युलर जेल" कडे निघाला.

मराठी भाषा प्रचंड समृद्ध आहे, पण कधी कधी इंग्रजी शब्दच कदाचित आपल्या भावनांचे चपखल वर्णन करू शकतात! आणि आजकाल वापरात असलेल्या "बिझनेस लँग्वेज" मध्येच सांगायचं झालं तर तोंडातून एकच शब्द बाहेर पडला - "मार्वलस" !!

६९३ खोल्यांच्या भव्य जेल आणि त्याचा सर्वेसर्वा डेव्हिड बॅरी ह्याने स्वतःच्या राज्यकर्त्यांचे आदेश पाळण्यासाठी आणि इंगजी सत्ता वाचवण्यासाठी येथे क्रांतिकारकांवर अतोनात जुलूम केले, शासन-द्रोहाला जरब बसवणे म्हणजे काय ते इथे आल्यावर कळते !

एखाद्या ७ पाकळ्यांच्या सूर्यफुलाप्रमाणे ह्या जेल ची रचना एवढी जबरदस्त होती की कोणाही कैद्याला एकदा कोठडीत गेले की दुसरा कैदी ना दिसायचा न बोलता यायचे, कोठडीचा कडी कोयंडा २ फूट लांबवर अडकवलेला असायचा जेणेकरून समजा कैद्यांना किल्ल्या जरी मिळाल्या तरी दार उघडता येणे अशक्य व्हावे ! सावरकर आणि त्यांचे भाऊ इथे २ वर्ष एकत्र असून त्यांना एकमेकांबद्दल काहीही माहिती नव्हती ! जेलर डेव्हिड बॅरी म्हणायचा तुम्ही इथे पिकनिकला नाही आला आहात.. कैदी आहात, तोंड बंद करून शिक्षा भोगा नाहीतर अजून जबरी शिक्षांना तयार व्हा !! ह्या कैद्यांना रोजचे ४० पौंड तेल काढावे लागत असे, शालेय जीवनात कितीही वेळा वाक्प्रचार केला असला तरी खरोखरीच "घाण्याला जुंपणे" म्हणजे काय असते ते तिथे गेल्याशिवाय कळणार नाही... !

लोकं जेल मध्ये उभे राहून फोटो काढून घेतात... तेलाच्या घाण्याजवळ वेगवेगळ्या पोझ देऊन उभे राहतात...फाशीघराजवळ स्वतःच्या गळ्यात स्कार्फ अडकवून फोटो काढतात... डिजीटल फोटोग्राफीने थोडेसे तारतम्य कमीच झाले आहे... पण तरी हे सगळे बघताना देखील मला विचित्र वाटले!! ... !

सेल्युलर जेल चा नजारा दिमाखदार होता... ब्रिटिश शासनाची शानोशौकत आणि धाक ह्या दोन्हीचे प्रतीक उंचावणारा ! साउंड & लाइट्स शो चुकवू नका... जेल जागा ठेवण्याचा प्रयत्न अप्रतिम केला आहे त्या शो मध्ये !

सगळा जेल फिरल्यावर का कोणास ठाऊक मला थोडेसे वाईट वाटले पण जास्त राग आला नाही... उलट थोडीशी कीवच आली. आपल्यावर लादलेल्या शासनपद्धतीतल्या काही गोष्टी ह्या खरंच इंग्रजांनी टाळल्या असत्या तर ते लोक अजूनही अनेक वर्षे राज्य करू शकले असते... आणि आपण त्यामधल्या काही गोष्टी आत्ता अमलात आणल्या तर पुढची अनेक वर्षे आपण देखिल हे सुखैव स्वातंत्र्य अनुभवू शकू असे वाटले !! देशासाठी लढणाऱ्यांना ४० पौंड तेल काढावे लागायचे आणि बलात्कारी, आतंकवादी, नक्षली लोकांना मात्र आपल्याकडे वर्षोनुवर्षे सरकारी इतमाम मिळतात. ४० च्या जागी ४ पौंड तेल काढायला लावले ना तरी crime rate ८०% कमी होईल. आपल्याकडे लोक गुन्हे करतात कारण कोणाला कशाची भीतीच उरलेली नाही !! जर लोक स्वयंशिस्तीने नीट राहू शकत नसतील तर भीतीने नीट राहण्यास भाग पाडणारे शासन हवे !

कहर म्हणजे सावरकरांच्या कोठीमध्ये बेशरम पद्धतीने पाटी लावण्यात आली आहे की "जगतील एकमेव ऐतिहासिक सत्य - सावरकरांनी त्यांच्या बेड्या/साखळ्या/काटे वापरून तिथे जेल च्या भिंतीवर "कमला" हे काव्य लिहिले"
-- पण त्या कोठीमध्ये संपूर्ण व्हाईटवॉश दिलेला आहे... ती कोठी "जशी आहे तशी" जपण्याची जबाबदारी कोणाची होती ?? आणि समजा हा इतका नाकर्तेपणा स्वातंत्र्यापूर्वीच झाले होते तर मग तसे कोठेही लिहिलेले का नाही ? आज इतर देशांत त्यांचे सांस्कृतिक धरोहर आहेत तसे जपले जात असताना आपल्याकडेच ही उदासीनता का ?

असो, रागाच्या भरात येणारे सगळे विचार कागदावर उतरवता येत नाहीत, पण हा अनुभव पुन्हा डोकं सुन्न करतो - तो ह्याची देही ह्याची डोळा तेथे जाऊनच घेतला पाहिजे ! जेल नंतर त्या दिवशी काहीच पाहू नये असे वाटले !

परंतु ट्रीप मध्ये ठरल्याप्रमाणे "स्नेक आयलंड" जवळच्या बीच वर गेलो. शांत समुद्र रात्र झाली की अचानक उफाळू लागतो आणि चमकणाऱ्या विजा आपल्याला आपण एका चहुबाजूने पाण्याने वेढलेल्या असाहाय्य बेटावर आहोत ह्याची पदोपदी जाणीव करून देत राहतात !

द्विपसमुहातील हॅवलॉक - हे एक प्रसिद्ध बेट आहे, येथेच एलिफंट बीच वर सगळ्या प्रकारचे Water sports आहेत ! अंडर-सी-वॉक चुकवू नका... विलोभनीय अनुभव आहे जेव्हा आपण ३० फूट खोल समुद्रात नॉर्मल ब्रिदिंग करत विविध माशांना हाताने खाऊ भरवतो... कमाल !! असे इतर कुठेही भारतात होणे शक्य आहे किंवा नाही.... माहीत नाही !नील आयलंड, रॉस आयलंड देखिल न चुकता पाहावे... "काला पत्थर" बीच वर तर मॉरिशिअस ला आल्यासारखे वाटते ! निळेशार पाणी, सुंदर समुद्रकिनारे आणि जलचर संपदा ह्यामध्ये तुम्ही हरवून जाता !


बाराटांग बेट समूहाजवळ - "मड-वॉल्कॅनो आणि लाईमस्टोन केव्हज" ची बरीच बतावणी ऐकतो -हे छान आहे बघण्याजोगे आहे... पण माझे ऐकाल तर अजिबात जाऊ नका... पैसे आणि वेळ फुकट वाया जाईल, पोर्ट ब्लेअर पासून जाऊन येऊन साधारण १०-१२ तास लागतात ! एकतर "जारवा" ह्या आदिवासींच्या राखीव भागातून मिलिटरी कॉनवॉय शिवाय तुम्हाला जाता येत नाही - (म्हणजे त्यांचे टायमिंग चुकले तर बसा बारटांगलाच ! ) आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे बघण्यासारखे काहीच खास नाही !! "मड वॉल्केनो तर नुसता दिवाळीचा किल्ला आहे (तो बरा !)" आणि लाईमस्टोन केव्ह एवढी अरुंद, अंधारी आणि पाणथळ आहे की जा-जा आणि ये- ये मध्येच फुकट वेळ जातो ! त्यापेक्षा त्याचे यूट्यूब/ट्रिपऍडव्हायजर वर फोटो/व्हिडिओ पाहा !!

३ दिवस पोर्ट ब्लेअर आणि २ दिवस हॅवलॉक च्या ट्रीप चा शेवटचा दिवस संपला, आम्ही आपापल्या बॅग्स भरल्या - गाइडला त्याच्या सर्विस नुसार आमच्या ग्रुपतर्फे काही रक्कम देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो..  सोबत समुद्र, निळे पाणी, जेल, आमचा ग्रुप आणि अश्या अनेक अविस्मरणीय आठवणी घेऊन !

-
आशुतोष दीक्षित.